बेळगाव जिल्हा महिला परिषदतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे संथगतीने सुरू आहेत. रस्ते, गटारींचे काम खोळंबलेले आहे. बेळगावमध्ये प्रदूषण मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. याचबरोबर महागाईमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून या सर्व समस्या सोडविण्यासाठी बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सध्या शहरातील कामे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वारंवार बंद करण्यात येत आहेत. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. याचबरोबर पायी चालत जातानाही समस्या निर्माण होत आहेत. लहान-मोठे अपघात घडत आहेत. तेंव्हा तातडीने या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या सर्व कामांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. ते नियोजन करण्यासाठी महिला सक्षम आहेत. तेंव्हा महिलांचे मार्गदर्शनही घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. महागाईमुळे आर्थिक बजेट कोसळले असून महागाई कमी करावी, अशी मागणीही केली. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.