अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीची पुन्हा जैसे थे परिस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध चौकांमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. मात्र काही आठवडय़ातच सदर सिग्नल बंद पडले असून, विविध चौकात वाहतूक कोंडीची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर ट्रफिक सिग्नल शोभेसाठी बसविण्यात आले आहेत का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. विविध चौकात डिजिटल फलक आणि ट्रफिक सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. शहर उपनगरांतील 16 चौकात टॅफिक सिग्नलची उभारणी करण्यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून स्मार्ट सिटीच्या कंट्रोल ऍण्ड कमांड सेंट्रलला जोडण्यात आले आहेत. या अंतर्गत विविध चौकांतील ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. पण काही दिवसांतच सर्व टॅफिक सिग्नल बंद पडले असून, विविध चौकात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
रस्ते काँक्रिटीकरणाचे आणि विकासाचे काम सुरू असल्याचे सांगून ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. पण शहरातील बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण झाले असताना ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्याचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आरपीडी क्रॉस, राजेंद्र प्रसाद चौक, राणी चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल व कॅम्प येथील ग्लोब थिएटरजवळील ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. पण यापैकी केवळ राणी चन्नम्मा चौकातील ट्रफिक सिग्नल सध्या सुरू आहे. अन्य ठिकाणांचे ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
राजेंद्र प्रसाद चौकातील ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आला असून बॅरिकेड्स लावून येथील रस्तादेखील वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी तीन रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर रहदारी पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दंड वसुली करण्यातच मग्न असतात. परिणामी वाहनधारकांना ये-जा करताना अडचण भासत आहे. किमान एका रहदारी पोलिसाने वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, तसेच बंद ठेवण्यात आलेले ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.