पन्हाळा-प्रतिनिधी
किल्ले पन्हाळगड ऐतिहासिक वास्तूनी संपन्न दुर्ग म्हणून ओळखला जातो. हा समृध्द वारसा जपला जावा म्हणून म्हणून दुर्गसेवा प्रतिष्ठान, टोप-कासारवाडीचे शिवप्रेमी सातत्याने संवर्धन करत आहेत. आज किल्ले पन्हाळा गडावर संवर्धन करत असताना अंधारबाव ते तीन दरवाजमधील तटबंदीमध्ये तोफेचा लोखंडी गोळा आढळून आला. तटबंदीमध्ये अर्धवट तुटलेल्या अवस्थेत तोफेचा गोळा व तोफेच्या माऱ्याच्या दगडावरील खुणा स्पष्ट दिसत आहे. हा गोळा २ किलो ७६६ ग्रॅमचा असून पुरातत्व विभागाकडे रोहन चेहरे व सहकाऱ्यांनी सुपूर्द केला.
हा तोफगोळा आढळून आल्यानंतर शिवप्रेमींनी याची माहिती पर्णाल इतिहास संशोधन मंडळास दिली. यावेळी प. इ.स. पन्हाळ्याचे अभ्यासक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पन्हाळगडावर सिद्धी जौहरच्या वेढयावेळी राजापूर येथून हेन्री रेव्हिगस्टन हा दोन तोफा घेऊन वेढ्यामध्ये सहभागी झाला होता. तसेच औरंगजेबाच्या वेढ्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात अद्ययावत तोफांचा वापर केल्याची माहिती कागदपत्रांमधून मिळते. १८४४ च्या बंडावेळी देखील या परिसरातून गडावर तोफा डागल्या होत्या. परंतु त्यावेळी गडावर देखील अद्यायावत तोफा असल्याने भौगोलिक परस्थिती पाहता इतक्या जवळून तोफांचा मारा करणे अवघड होते. त्यामुळे हा तोफेचा मारा यापूर्वी झाला असावा असे मत पुरातत्त्व इतिहास अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी दुर्गसेवा प्रतिष्ठान, कासारवाडीचे कार्यकर्ते रोहन चेचरे, सौरभ मुळीक, संग्राम लुगडे, सौरभ पोवार, प्रथमेश लुगडे, प्रतीक शिंदे, ओंकार जाधव, दिपक मुळीक, प्रताप वरिंगे, ऋषिकेश कुशिरे, गौरव शिंदे, सागर कोळेकर, विकी भोसले, बारक्या सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत पर्णाल इतिहास संशोधन मंडळाच अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी प्रत्यक्ष मारा झालेल्या ठिकाणी तटबंदीमध्ये तोफेचा गोळा मिळून येणे ही विशेष बाब आहे. सिद्धी जौहरने व औरंगजेब आदींनी धमधमे बांधून किल्ले पन्हाळगडावर तोफेचा मारा केला होता. यानंतरच्या काळात देखील तोफेचा मारा झाल्याचे दिसून येते. यावर प. इ. स. च्या वतीने सखोल संशोधन करण्यात येईल असे सांगितले.
दुर्गसेवा प्रतिष्ठान च्या वतीने दर सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने दुर्गसंवर्धनाचे काम करत असतो. तटबदीची स्वच्छ्ता करत असताना तोफेचा गोळा आढळून आला. तो पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केला. दुर्गसेवा प्रतिष्ठान, टोप-कासारवा़डीचे रोहन चेचरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले