प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा ग्रामीण स्वच्छ सर्व्हेक्षण सुरु आहे. त्याकरता फिडबॅक मोहिम सुरु असून ही मोहिम दि. 25 पर्यंत चालणार आहे. आतापर्यंत सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून हाच क्रमांक कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरुन फिडबॅक द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केले आहे. दरम्यान, रविवारी 49 हजार 365 जणांनी मोबाईलवर तर वेबसाईटवर 17447 जणांनी असे एकूण 66812 जणांनी फिडबॅक नोंदणी केली आहे.
सातारा जिल्ह्याचे स्वच्छ भारत अभियानामध्ये चांगले काम आहे. स्वच्छ भारत अभियानात चांगले काम प्रत्येक गावागावात झाले आहे. अनेक गावात घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प सुरु केलेला आहे. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात आहे. 1949 गावांमध्ये सध्या स्वच्छतेची चळवळ रुजली आहे. बनवडीसारखे गाव देशाला आदर्श ठरु पाहत आहे. सातारा जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिह्याचा क्रमांक प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये फिडबॅक मागणीमध्ये सातारकरांनी चांगले फिडबॅक नोंदणी केली आहे. ही नोंदणी दि. 25 पर्यंत सुरु असून जिल्ह्याला प्रत्येकाने फिडबॅक करावे आणि सातारा जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केले आहे.