डॉ. अंजली जोशी ः आरपीडी कॉलेजमध्ये इंटरनॅशनल मेन्स्ट्रुअल हायजीन डे साजरा
प्रतिनिधी/ बेळगाव
ठराविक वयामध्ये प्रत्येक मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात. मुलींना येणारी मासिक पाळी ही गलिच्छ, तुच्छ मानणे थांबवायला हवे. तो निसर्गधर्म आहे. त्याची माहिती घेऊन आपण सुजाण झाले पाहिजे, असे मत केएलईच्या क्लिनिकल समन्वयक डॉ. अंजली जोशी यांनी व्यक्त केले.
आरपीडी कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्सतर्फे 28 मे रोजी इंटरनॅशनल मेन्स्ट्रुअल हायजीन डे आचरण्यात आला. आरपीडीच्या लेडीज रुममध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेच्या पदाधिकारी बिंबा नाडकर्णी, डॉ. धनश्री आजगावकर, प्रा. शोभा नाईक, महिला विभागाच्या प्रमुख डॉ. शर्मिला संभाजी उपस्थित होत्या.
डॉ. अंजली जोशी यांनी मासिक पाळीच्या काळात आपले आरोग्य आणि स्वच्छता कशी राखावी हे सांगून पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळे यांचा समावेश असलेला आहार, पाणी पिण्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी डॉ. शोभा नाईक यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. धनश्री आजगावकर यांनी स्त्राrला मातृत्व ही देणगी आहे. लिंग समानतेचा आग्रह होत असला तरी आपण एक पिढी पुढे नेत असतो, हे लक्षात घेऊन स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगणे बंद करा, असे सांगितले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यावतीने सचिव संतोष हत्तरकी यांनी क्लबतर्फे दोन वेंडींग मशीन आणि 400 सॅनिटरी पॅड्स दिले. सूत्रसंचालन वैशाली हणमगोंड यांनी केले. नुपूर रानडे यांनी आभार मानले.