कुंडल / वार्ताहर
येथील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारच्या प्रतिसरकार मधील तुफानसेनेचे कॕप्टन मा. रामचंद्र भाऊ लाड यांचे शनिवारी रात्री कुंडल येथे दुखःद निधन झाले…वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला असून
स्वातंत्र्य लढ्यातील एका सोनेरी पर्वाचा अंत झाला आहे.
कॕप्टन भाऊंनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारच्या तुफान दलाचे रणझुंजार कॅप्टन म्हणून तुफान दलाचे फिल्डमार्शल क्रांतिआग्रणी जी डी बापू लाड यांच्या खांद्याला खांदा भिडवून मोठी कामगिरी बजावली होती. गोव्यातून शस्त्रे आणून भूमिगत क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणे आणि सेवा दलाच्या शाखांच्या नावाखाली शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्वातंत्र्यानंतर निजामशाही हटवण्यासाठी रझाकारांच्या विरोधात हैदराबाद सशस्त्र स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र, लढा गोवा मुक्ती संग्राम आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नीही अग्रेसर राहून कॅप्टन राम भाऊ लाड यांनी कामगिरी बजावली होती.
स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट ला कुंडल येथे भरणारे कुस्ती मैदानाचे समालोचन असो की शेतकरी कामगार पक्षाच्या विविध आंदोलनाची जबाबदारी असो त्यात त्यांनी उत्कृष्ट संघटकाची भूमिका नेहमीच पार पाडली. वयाच्या बहात्तराव्या वर्षी देशाच्या स्थितीवर अस्वस्थ होऊन त्यांनी असे आम्ही लढलो या नावाची प्रतिसरकारच्या कार्याची माहिती देणारी एक पुस्तिका प्रकाशित केली होती. त्यांच्या निधनाने कुंडलसह परीसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज ररविवार दी. ६ रोजी सकाळी कुंडल येथे अंत्यसंस्कार करणेत येणार आहे.