आदिवासींची जमीन बळकावून त्या जागी अतिक्रमण करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. मध्य प्रदेशही याला अपवाद नाही. शबनम शाह या विरोधात लढा देत आहे. ती एकता परिषदेची कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. या कामाची पावती म्हणून शबनमला पुरस्कारही जाहीर झाला आहे. शबनमच्या प्रयत्नांमुळे 1400 आदिवासी कुटुंबियांची हक्काची जमीन वाचली आहे.
शबनम शाह मध्य प्रदेशमधल्या मुणगाओली गावची. तिला वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या गावात बेकायदेशीरपणे जमीन हस्तगत करण्याचे प्रकार सुरू असल्याची जाणीव झाली. शबनमच्या कुटुंबियांनाही आपल्या जमिनीसाठी, घरासाठी बराच लढा द्यावा लागला. काही हजार रुपये खर्च केल्यानंतर आणि सतत न्यायालयाच्या वार्या केल्यानंतर तिच्या वडिलांना न्याय मिळाला. आपल्या हक्काच्या जागेसाठी त्यांनी थोडीथोडकी नाही तर 30 वर्षं लढा दिला. दरम्यानच्या काळात शबनमच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर साधारण दोन वर्षांनी शबनमने एकता परिषदेच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला. एकता परिषद म्हणजे जमिनीच्या हक्कांसाठी सुरू असणारी लोकचळवळ. आदिवासी आणि गरीबांची कशी परवड सुरू आहे, त्यांच्या जमिनी कशा पद्धतीने हस्तगत केल्या जात आहेत याची तिला यावेळी माहिती मिळाली. ही सगळी विदारकता पाहून ती खूप अस्वस्थ झाली. वडिलांनी दिलेल्या लढय़ाचा तिला खूप अभिमान वाटला. शबनमने एकता परिषदेचं सदस्यत्व स्वीकारलं आणि या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. अवघ्या दहा वर्षांमध्ये ती एकता परिषदेची जिल्हा समन्वयक झाली. मधल्या काळात तिने प्रचंड काम केलं आणि 1400 आदिवासी कुटुंबियांना त्यांचे हक्क मिळवून दिले.
तिच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ‘वूमन्स वर्ल्ड समीट फाउंडेशन’तर्फे ‘प्राईज फॉर वूमन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाईफ’ हा पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी जगभरातून दहा महिलांची निवड झाली असून त्यापैकी चार भारतीय आहेत. शबनमच्या वडिलांना मुलांना खूप शिकवायचं होतं. शबनमने वकील व्हावं अशी त्यांची इच्छा होती. घरात आर्थिक विवंचना तसंच जमिनीशी संबंधित वाद असतानाही शबनम आणि तिच्या भावंडांना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. शाळेत जाणं, अभ्यास करणं, खेळणं आणि खाणंपिणं हे त्यांचं लहानपणीचं काम होतं. आपलं बालपण आनंदात गेल्याचं शबनम सांगते. शबनमच्या आजोबांनी 1990 मध्ये एका कुटुंबाला खोली भाडय़ाने दिली. कालांतराने या कुटुंबाने या खोलीवर हक्क सांगायला सुरूवात केली. या भाडेकरूंनी वजन वापरून शबनमच्या कुटुंबियांना धमकवायला सुरूवात केली. त्यांना संपूर्ण घरावर ताबा मिळवायचा होता. मात्र शबनमच्या वडिलांनी नमतं घेतलं नाही. त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेलं. लढा दिला आणि घर ताब्यात घेतलं. वडिलांच्या निधनानंतर शबनमला शाळा सोडून त्यांचं किराणा दुकान सांभाळावं लागलं. काही काळानंतर तिच्या भावाने ही जबाबदारी घेतली. मग शबनमने पुन्हा शिक्षण सुरू केलं. पण तिला कायद्याची पदवी घेता आली नाही. शबनम कला शाखेत पदवीधर झाली. शबनम आता 30 वर्षांची आहे. तिने आपलं आयुष्य या चळवळीसाठी वाहून घेतलं आहे. या कामासाठी वेळ देता यावा म्हणून शबनमने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न केल्यानंतर एकता परिषद आणि गावकर्यांना पुरेसा वेळ देता येणार नाही असं तिला वाटतं. आदिवासींच्या हक्कांसाठी आपलं आयुष्य वेचणार्या शबनमच्या कार्याला सलाम!