प्रतिनिधी / हातकणंगले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जगाला चिंतेने ग्रासले आहे. संचारबंदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासन रात्रं दिवस डोळयांत तेल घालून पहारा देत आहेत. हातकणंगले येथे मात्र याला तडा देणारा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला असून बस स्थानक चौकांत बंदोबस्तास असलेले सर्वच पोलीस कर्मचारी एकाच वेळी गायब असून केवळ रिकाग्या खुर्चाच पहारा देत असल्याचे दिसून आले आहे.सर्वत्र पोलीस यंत्रणा अगदी जीवावर उदार होऊन काम करत असताना अशा काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण यंत्रणेलाच गालबोट लागत आहे.
कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यांसाठी सगळीकडेच युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर कोणी विनाकारण फिरू नये, गैरफायदा घेत कोणीही वाहनांनी प्रवास करू नये यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कराड, सातारा सह अनेक मार्गावरील हातकणंगले हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ना त्या निमित्ताने या मार्गावरील वर्दळ तुरळक प्रमाणांत आजही सुरूच आहे. कोणीही विनाकारण फिरु नये,मार्गावरील सर्व वाहनांची तपासणी करण्याचे अतिशय जोखमीचे काम येथील बसस्थानक चौकांतील तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडे आहे.
सुरवातीच्या काही दिवसांत हे काम अतिशय जबाबदारीने केले जात होते. मात्र आता त्यात काहीशी ढिलाई आल्याचे जाणवत असून शुक्रवारी सकाळी या नाक्यावर एकही कर्मचारी हजर नसलयाचे दिसून आले असून केवळ रिकाम्या खुच्र्या आणि रजिस्टर तेवढेच दिसून येत होते. अशावेळी एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.