खासदार आण्णासाहेब जोल्ले यांचे प्रतिपादन : कारखान्याच्या व्हर्चुअल सभेला सभासदांचा प्रतिसाद
वार्ताहर / निपाणी
निपाणी तालुका परिसरातील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. ऊस उत्पादक शेतकऱयांसह सभासद, कर्मचारी यांचा आधार असा हा कारखाना आहे. या कारखान्याला संकटातून बाहेर काढण्याचे यशस्वी प्रयत्न विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. अशा या कारखान्याला आपले व शासनाचे सदैव पाठबळ असून येणाऱया दहा वर्षात कारखाना कर्जमुक्त करण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केले.
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची 32 वी वार्षिक सभा शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हर्चुअल पद्धतीने बुधवारी घेण्यात आली. या सभेला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावताना सभासदांनी प्रतिसाद दिला. या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चंद्रकांत कोठीवाले होते. प्रारंभी संचालक पप्पू पाटील यांनी स्वागत केले. तर कार्यकारी अधिकारी शिव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना कारखान्याच्या कार्याचा आढावा घेत अहवाल वाचन केले. खासदार जोल्ले म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात 55 दिवसात 2 लाख 40 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा सुरू असलेला कारभार व व्यवस्थापन लक्षात घेऊन शासनाने सिस्टा पुरस्कार देताना पोहोच दिली आहे. परिसरातील कारखाने जो दर देतील तो दर देण्यास कारखाना कटिबद्ध आहे, असे सांगितले. अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, सध्या सभासद संख्या 23 हजार 851 असून भागभांडवल 100 कोटी आहे. सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 लाख विमा रक्कम मिळण्याची सोय केली आहे. गत गळीत हंगाम 86 दिवस चालला. 3 लाख 7 हजार 291 मे. टन उसाचे गाळप करताना 11.75 टक्के उताऱयानुसार 3 लाख 60 हजार 850 क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. त्याचप्रमाणे 15 मेगावॅट सहविद्युत प्रकल्पातून 26676400 किलोवॅट वीज उत्पादन केले आहे. उसाला प्रतिटन 2700 रुपये दर दिला आहे.
सध्या साखरेचे भाव कमी झाले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे कोणीच साखर घ्यायला तयार नाही. यासाठी साखर उत्पादनापूर्वीच मोलॅसिस सिरप विकण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. सभासदांना प्रतिकिलो 16 रुपयेप्रमाणे साखर देण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या दराचा फरक व जीएसटी कारखान्याला भरावा लागत आहे. हेस्कॉमने वीज खरेदी दर 5.18 वरून 3.68 रुपयेपर्यंत खाली आणल्याने तोटा सहन करावा लागत आहे, असे सांगितले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभेला ज्योतीप्रसाद जोल्ले, संचालक सुकुमार पाटील, आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, समित सासणे, प्रताप मेत्राणी, कल्लाप्पा नाईक, मनीषा रांगोळे, उज्वला शिंदे, सुजित जोशी, सिद्धू नराटे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.