अतिपावसाने रस्ता गेला वाहून : वाहनधारकांचे हाल
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसामुळे हिंडलगा-मण्णूर मार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणाचा फटका परिसरातील वाहनधारकांना बसत आहे.
अति पावसामुळे हिंडलगा-मण्णूर मार्गावरील रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाने रस्त्याशेजारील भरावा पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. रस्त्यावर शिल्लक राहिलेल्या माती आणि खडीमुळे दलदल निर्माण झाली आहे. परिणामी यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मण्णूर ते गोजगा या दोन किलोमीटरच्या मार्गाचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, हिंडलगा ते मण्णूरदरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
त्यातच अतिपावसामुळे या मार्गावरील खडी शिवारात वाहून गेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीलाही मोठा फटका बसला आहे. तातडीने या रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.