मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपला मोठाच दिलासा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साधारणतः दोन दशकांपूर्वी ‘हिंदू युवा वाहिनी’ची स्थापना केली आहे. मात्र गेली काही वर्षे ही संघटना निष्क्रिय अवस्थेत होती. 2022 ची विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर या वाहिनीच्या सध्याच्या अध्यक्षांनी सपमध्ये प्रवेश केल्याची अफवाही उठली होती. त्यामुळे ही संघटना नेमकी कोणाच्या बाजूने कार्य करणार, या संबंधी बरेच कुतुहल होते. मात्र, काही दिवसांपासून ही संघटना पुन्हा जोमाने कार्यरत झाल्याचे पहावयास मिळत आहे. हा योगी आणि भाजप यांना दिलासा मानला जात आहे.
भारतीय जनता पक्षाने योगी अदित्यनाथ यांना त्यांच्या मूळ गोरखपूर जिल्हय़ातील गोरखपूर शहर मतदारसंघातून रणसंग्रामात आणले आहे. त्यामुळे हिंदू युवा वाहिनी पुन्हा कार्यरत झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत योगी आणि भाजप या निवडणुकीत विजयी झालेच पाहिजेत, या निर्धाराने ही संस्था आता कामाला लागली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या संघटनेने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. यंदा या संघटनेचे कार्यकर्ते प्रारंभी फारसे उत्साही दिसत नव्हते. तथापि आता मरगळ झटकून त्यांनी कामाला प्रारंभ केल्याने भाजपला बळ मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे निष्क्रीयता
ही संघटना गेल्या काही वर्षांमध्ये निष्क्रीय झाल्याचा आरोप करण्यात येत असला तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे स्पष्टीकरण संघटनेने दिले आहे. गेला दीड वर्षांहून अधिक काळ देशावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते नाईलाजास्तव घरात बसून आहेत. मात्र, ते एकमेकांच्या संपर्कात असून कार्य करीत आहेत. आता निवडणूक घोषित झाल्यानंतर ते पुन्हा घराबाहेर पडल्याने नव्याने सक्रीय झाल्याप्रमाणे वाटतात असा दावा करण्यात आला आहे.
भाजपच्या हातात घात घालून
संघटनेने या निवडणुकीत स्वतः ला झोकून दिले असून जेथे जेथे संघटनेच्या शाखा आहेत तेथील कार्यकर्त्यांना स्थानिक भाजप उमेदवारांसाठीच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 403 पैकी किमान 150 मतदारसंघांमध्ये या वाहिनीचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. यंदाही भाजप नेत्यांना सर्व सहकार्य करा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला गेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संघटनेवर आरोप
गेल्या काही वर्षांमध्ये या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. बुलंदशहर येथे मुस्लीम युवकांची सामुहिक हत्या केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांवर आहे. या मुस्लीमाने एका हिंदू तरुणीला पळविल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बाघपत येथे लव्ह जिहादच्या संशयावरुन या संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात एका मुस्लीम जोडप्याला मारहाण केली असाही आरोप आहे. या संबंधीची प्रकरणे न्यायालयांमध्ये सुरु आहेत.
मतदारकेंद्र पातळीवर कार्य
हिंदू युवा वाहिनीने उत्तर प्रदेशात मतदार केंद्र पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. कार्यकर्त्यांचे छोटे गट बनविले जात आहेत. तसेच त्यांच्यावर एका एका मतदान केंद्राचे (बूथ) उत्तरदायित्व सोपविले जात आहे. या मतदानकेंद्रातील प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून त्याला भाजपला मत देण्याविषयी तयार करण्याचे कार्य केले जात आहे. विशेषतः ज्या मतदानकेंद्रांवर भाजपला कमी मतदान झाले आहे, तेथे जास्त लक्ष केंद्रीत करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला गेला आहे.
चांगला प्रतिसाद
संघटनेच्या कार्याला ज्याप्रमाणे समाजाचा प्रतिसाद आहे, तसाच प्रचार कार्यालाही मिळत आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ही संघटना उत्तर प्रदेशाच्या 100 हून अधिक मतदारसंघांमध्ये परिणाम घडवून आणू शकते, असे विरोधकही मान्य करतात. त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये ही संघटना जितकी जास्त कार्यरत होईल, तितका भाजपला लाभ होऊ शकतो अशीही चर्चा आहे. मात्र काही विरोधी नेत्यांच्या मते संस्थेच्या कार्यापेक्षा तिला मिळणारी प्रसिद्धीच जास्त आहे.
समाजसेवेवर दिला जात आहे भर
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर या संघटनेने सामाजिक कार्य आणि सेवेवर भर दिल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशात अजूनही अस्तित्वात असणारी अस्पृष्यतेची चाल, हिंदूंमधील जातीभेद आणि त्यामुळे निर्माण झालेली उच्चनीच भावना आदी सामाजिक कुप्रथांच्या विरोधात ही संघटना कार्य करते. हिंदूंमध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, विविध हिंदू समुदायांची एकत्र संमेलने भरवणे, स्नेह भोजनांचा कार्यक्रम घडविणे आदी कार्ये संघटनेकडून केली जातात. कोरोना विरुद्धच्या संघर्षातही ही संघटना आघाडीवर राहिली आहे. त्यामुळे संघटनेची प्रतिमा उजळण्यास मोठेच साहाय्य झाले असून तिची समाजमान्यतही वाढली आहे, असे मत अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे.