शिवाजी पेठेचा महावितरण खणखणीत इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
अख्खा महाराष्ट्र कोरोना काळातील वाढीव वीज बिले माफ करा, अशी विनंती करतोय. असे असतानाच महावितरणने 15 दिवसात बिले भरा नाहीत, अन्यथा घरातील वीज कनेक्शन तोडू अशा नोटीसा देऊन ग्राहकांना बुचकळ्यात टाकण्याच्या केलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत हिंमत असेल तर महावितरणने वीज कनेक्शन तोडून दाखवावीत, असा खणखणीत इशारा शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेच्या वतीने रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.
शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळाने कोरोना काळातील वाढीव वीज बिलांसंदर्भात शिवाजी मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण होते. बैठकीच्या प्रारंभी मंडळाचे सहसचिव सुरेश जरग यांनी बैठकीमागील पार्श्वभूमी सांगितली. यानंतर बोलताना बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे म्हणाले, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हजारो लोकांचे व्यवसायही बंद झाले. अनेकांच्या घरातील व्यक्ती कोरोनाने वारले. उपचारासाठी रूग्णालय न मिळाल्यानेही अनेकांचे निधन झाले. या कारणांनी लोकांची आर्थिक स्थिती बिघडल्याचे महावितरणला माहिती असूनही वाढीव वीज बिले देऊन लुबाडणूक सुरू केली आहे. जनता या लुबाडणूकीला खणखणीत उत्तर देईल.
माजी नगरसेवक व शिवाजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष अजित राऊत म्हणाले, टोलला हद्दपार करण्यासाठी लोकांनी हातात कोल्हापूरी चप्पल आणि लाटणं घेतले होते. येत्या काही दिवसात जर महावितरणने वीज बिले माफ केली नाहीत, तर कोल्हापूरी हिसका दाखविण्यासाठी जनता हातात कोल्हापूरी चप्पल आणि लाटणं घेऊन रस्त्यावर येईल. शिवाजी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, वाढीव वीज बिले माफ करुन घेण्यासाठी शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेने साम, दाम, दंड, भेदची सगळी तयारी केली आहे. जनता कोरोना काळातील वाढीव वीज बिले माफ करा, अशी विनंती करत असतानाच महावितरणने बिले भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडू अशा नोटीसा देऊन ग्राहकांना डिवचले आहे. आता महावितरणने एवढ्यावर थांबावे, अन्यथा महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सुनिता पाटील यांचेही भाषण झाले.
बैठकीला महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती चंद्रकांत सूर्यवंशी, माजी नगरसेवक बाबा पार्टे, सुरेश गायकवाड (पतोडी), स्वप्निल पार्टे, राजू जाधव, चंद्रकांत पाटील, प्रताप देसाई, श्रीकांत भोसले, प्रकाश घाटगे, संदीप घाटगे, शरद नागवेकर, यांच्यासह राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक, अनिता जाधव सुवर्णा मिठारी उपस्थित होत्या.