एस. आर. पाटील यांची मागणी : दिग्गज व्यक्तींना वाहिली श्रद्धांजली
प्रतिनिधी /बेळगाव
देशाच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा आणि इतर अकरा जणांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू धक्कादायक आहे. यामागे घातपात होण्याचा संशय आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी सभागृहात सांगत याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी सभाध्यक्षांकडे केली आहे.
सोमवारपासून सुरू झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेमध्ये राज्यातील तसेच देशातील दिग्गज व्यक्तींच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी त्या प्रस्तावाला मान्यता देत विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी ही मागणी केली आहे. देशाच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा असा मृत्यू झाला, हे देशाचे दुर्दैव आहे. याची चौकशी पूर्ण झालीच पाहिजे. यापूर्वीही पुलवामा येथे जी घटना घडली, तीही दुर्दैवीच होती. तसाच हा घातपात झाल्याचा संशय असून राज्य सरकारने व केंद सरकारने संयुक्तपणे चौकशी करावी, अशी मागणी केली.
अशा घटनांमध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अत्यंत चांगल्या दर्जाचे हेलिकॉप्टर तसेच 25 वर्षांचा अनुभव असलेला वैमानिक असतानाही घटना घडली. यामागे घातपाताचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिपिन रावत यांच्यासह कोनीजिती रोसय्या, विरुपाक्ष अगडी, विधान परिषदेचे माजी सदस्य एस. आर. मोरे, अभिनेते पुनित राजकुमार, स्वा. सै. पी. भोजराज हेगडे, प्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार के. एस. नारायणाचार्य, नाडोज पद्मण्णा, अभिनेते एस. शिवराम यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधानपरिषद सभाध्यक्ष कोट श्रीनिवास पुजारी यांनी सभागृहामध्ये प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वांनी अनुमती देऊन दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कामकाजाला सुरुवात करण्यात आली.