बेंगळूर/प्रतिनिधी
आज पासून सुरू होणारे नवीन वर्षातील कर्नाटक विधानसभेचे पहिले अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे कारण विरोधी पक्ष नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर राज्यात असंतोषाला सामोरे जाणाऱ्या भाजप सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
सात दिवस चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल वजुभाई वाला यांच्या अभिभाषणाने सुरू होणार आहे आणि ५ फेब्रुवारीला त्याचा समारोप होणार आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळात सात नव्या मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळात काही फेरबदल करून मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर हे पहिले अधिवेशन आहे.
सरकारच्या कारभाराबद्दल काही भाजप आमदारांनी केलेल्या नाराजीचा सूर पुन्हा सभागृहात घुमण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याचा विचार करणाऱ्या विरोधी पक्षांना राज्यातील पूरपरिस्थिती, अर्थव्यवस्था त्याचबरोबर शेतकर्यांशी संबंधित कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन आणि विकासाच्या कामांसाठी निधीची कमतरता यावरही अधिवेशनात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.