200 रेल्वेगाडय़ांचे तिकीट आरक्षण लवकरच सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे 1 जूनपासून आणखी 200 रेल्वेगाडय़ांचे संचालन करणार आहे. या सर्व रेल्वेगाडय़ा विनावातानुकुलित असतील अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत मंगळवारी रात्री दिली आहे. भारतीय रेल्वे 1 जूनपासून स्वतःच्या वेळापत्रकानुसार प्रतिदिन 200 विनावातानुकुलित रेल्वेगाडय़ा सुरू करणार आहे. या रेल्वेगाडय़ांकरता लवकरच तिकीट आरक्षण सुरू होणार आहे. सद्यकाळात या रेल्वेगाडय़ांच्या मार्गासंबंधी कुठलीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीमुळे देशात रेल्वेसेवा रोखण्यात आली होती. रेल्वेने यापूर्वी 10 मे रोजी 15 वातानुकुलित रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा केली होती. 12 मेपासून सुरू झालेल्या या विशेष रेल्वेसेवेकरता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करता येते. कोरोना संसर्गापासुन बचावासाठी तिकीट आरक्षण केवळ ऑनलाईन पद्धतीद्वारे करता येणार आहे.
रेल्वेस्थानकावर केवळ प्रवाशांनाच जाण्याची अनुमती आहे. स्थानक परिसरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी केली जात आहे. या तपासणीकरता किमान 1 तास अगोदर रेल्वेस्थानकावर पोहोचणे अनिवार्य आहे. प्रवाशांना संसर्गाशी संबंधित अन्य नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. मास्कचा वापर तसेच आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करणेही अनिवार्य आहे.