मास्क, सामाजिक अंतर सक्तीचे : जत्रा, धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम : मुख्यमंत्र्यांचा बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी झाल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत असून 1 जूनपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सुरक्षेसाठी भाविकांना मास्क आणि सामाजिक अंतर राखणे सक्तीचे राहणार आहे.
राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जारी झाल्यानंतर राज्यात निवडक 15 जिल्हय़ांमधील मंदिरांमधील पूजा-धार्मिक विधी पाहण्यासाठी ऑनलाईन, फेसबुक लाईव्हद्वारे व्यवस्था करण्याची चर्चा सरकारी पातळीवर सुरू होती. त्यामुळे राज्यातील 52 मंदिरांमध्ये बुधवार दि. 27 मे पासून मंदिरांच्या ऑनलाईन सेवेला प्रारंभ होत आहे. याच दरम्यान, 1 जूनपासून सामाजिक अंतर आणि मास्क परिधान करून भाविकांना देवदर्शनाची व्यवस्था करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदी, चर्च उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
धर्मादाय मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी मंगळवारी विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंदिरे उघडण्याबाबत चर्चा केली. राज्यातील मंदिरे बंद असल्याने येथून मिळणारे उत्पन्न स्थगित झाले आहे. त्यामुळे 1 जूनपासून मंदिरे उघडण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित मंदिरांची असेल. सध्या तरी जत्रा, धार्मिक उत्सव, कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.