15 वर्षांची मर्यादा होणार पूर्ण : महामंडळासमोर गंभीर समस्या
पणजी : येत्या दि. 15 एप्रिल रोजी कदंबच्या 100 बसगाड्यांनी 15 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण केल्याने भंगारात टाकाव्या लागणार असल्याने कदंबसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी तोपर्यंत 100 नव्या ईलेक्ट्रिक बसेस कदंबच्या ताफ्यात रजू व्हाव्यात, यासाठी आपले प्रयत्न जारी असल्याचे जाहीर केले. तरीदेखील आणखी 200 बसेस कमी पडत असल्याने खासगी बसेस भाडेपट्टीवर घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत प्रस्ताव मंजूर करून घेऊन या बसेस प्रयोगिक तत्वावर काणकोण, मडगाव, आणि फोंडा-पणजी या दरम्यान सुरू केल्या जाणार आहेत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यावर निर्माण झालेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या संकटावर भाष्य केले असून दै. तरुण भारतशी बोलताना कदंबसमोर गंभीर समस्या उद्भवल्याचे मान्य केले. येत्या 15 एप्रिलपर्यंत कदंबच्या ताब्यात असलेल्या व मार्गावर धावणाऱ्या 100 बसेस या वाहतूक कायद्यानुसार भंगारात टाकाव्या लागणार आहेत. या बसेस 15 वर्षांची सेवा येत्या दि. 15 एप्रिल रोजी पूर्ण करतील. रस्त्याच्या बाहेर या बसेस ठेवाव्या लागणार असल्याने त्याजागी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. 100 बसेस कदंबच्या ताफ्यात साधारणत: 10 एप्रिलपर्यंत याव्यात, यासाठी सर्वते प्रयत्न केलेले आहेत. आता येणाऱ्या सर्व बसेस ईलेक्ट्रिकल पद्धतीच्या बसेस राहतील.
700 पैकी केवळ 300 खासगी बसेस कार्यरत
कोविड काळात सार्वजनिक वाहतूक बंद केल्यानंतर ज्या 700 खासगी बसेस चालू होत्या. त्यातील आज जवळपास केवळ 300 खासगी बसेस चालतात, त्यादेखील महत्त्वाच्या मार्गावर व महत्त्वाच्या वेळी. दोन फेऱ्या मारून पुन्हा बस मालक गॅरेजमध्ये आणून ठेवतात. याचा सार्वजनिक वाहतुकीवर गंभीर विपरित परिणाम झालेला आहे. त्यामुळे ज्या खासगी बसेस बंद पडलेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करून या बसेस मार्गावर आणण्यासाठी एक आकर्षक योजना तयार करीत आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर खासगी बस मालकांकडून बसेस मागविल्या जातील. हंगामी व प्रायोगिक तत्वावर या बसेस काणकोण-मडगाव व फोंडा-पणजी महामंडळा पुरस्कार घेऊन या बसेस भाडेपट्टीवर घेणार आहेत. हा प्रयोग केला नाही तर सार्वजनिक वाहतुकीचे मोठे संकट गोव्यावर निर्माण होऊ शकते.
250 बसेसच्या मागणी प्रस्ताव घेऊन माविन जाणार दिल्लीला
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे येत्या 1 मार्च रोजी नवी दिल्लीत जाणार आहेत. व ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. मागील गोवा भेटीत नितीन गडकरी यांनी माविन गुदिन्हो यांना गोव्यातील 250 ईलेक्ट्रिक बसेससाठी मान्यता दिली होती. आता या बसेस प्रत्यक्षात मिळविण्यासाठी अधिकृत आदेश जारी व्हावा. याकरिता प्रस्ताव घेऊन येत्या दि. 1 मार्च रोजी नवी दिल्लीला जाणार आहेत. गोव्यातला केंद्राकडून 250 ईलेक्ट्रिक बसेस मिळतील ज्या सर्व कदंबच्या ताफ्यात रुजू होतील. या प्रस्तावाबरोबरच म्हापसा, पणजी, मडगाव व वास्को येथे केंद्रीय पद्धतीनुसार ‘बसतळ’ स्थापन करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव घेऊन मंत्री माविन गुदिन्हो हे दिल्लीत जातील व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भेटतील. केंद्र सरकारच्याच मदतीने हे ‘बसतळ’ प्रकल्प उभारले जाणार आहेत.