अमित इब्रामपूरकर यांचा आमदार वैभव नाईक यांना सवाल : ..तर मनसेतर्फे नाईक यांचा जाहीर सत्कार करू!
प्रतिनिधी / मालवण:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांपैकी 113 कोटी आणि रस्त्यांच्या खड्डे दुरुस्तीपोटी 78 कोटींचा निधी मिळून 191 कोटींचा निधी 9 ऑक्टोबरला सुरू होणाऱया चिपी विमानतळ उद्घाटनादिवशी विमानातून ‘उडवून’ आणणार आहात काय? असा सवाल मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केला आहे.
इब्रामपूरकर म्हणतात, आमदारांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या मालवण तालुक्यातील नऊ आणि कुडाळ तालुक्यातील 14 कामे एप्रिलनंतर मंजूर आहेत, असे सांगितले आहे. मात्र, कार्यारंभ आदेशही काढला असला, तरी अगोदरची बिले प्रलंबित असल्याने ठेकेदार ही नवीन कामे सुरू करणार काय? नवीन कामे सुरू केल्यानंतर झालेल्या कामांची रनिंग बिले पाठवून निधींची मागणी होत असते. तो निधी ठेकेदारांना मिळणार काय? जर ठेकेदार अपयशी आमदारांमुळे आणि निधीअभावी रस्त्यांची कामे उरकणार नसतील, तर जनतेला अजून किती दिवस खड्डय़ांमधून वाट काढत राहवे लागणार, याचेही उत्तर आमदारांनी द्यावे. रस्त्यांच्या कामावर देखरेखीसाठी आवश्यक स्थापत्य अभियंते बांधकाम विभागाकडे नाहीत. कर्मचारी वर्गही अपुरा आहे. पुढील पावसाळ्य़ानंतरही हे रस्ते टिकणार काय? असे सवाल मनसेने केले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या रस्त्यांच्या कामांना 113 कोटींचा निधी आलेला नाही हे कणकवली आणि सावंतवाडी विभागाच्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासमोर मान्य केले होते. तर पूरस्थितीने खास बाब म्हणून मंजूर झालेल्या खड्डे दुरुस्तीच्या कामांना 78 कोटींचा जाहीर केलेला निधी अद्याप प्राप्त नाही. आता एप्रिलनंतर नवीन रस्त्यांच्या कामांना निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ‘खोटे बोलेन पण रेटून बोलण्या’चे आमदार नाईक यांनी थांबवावे. आज जनता सत्ताधारी लोकप्रतिनिधींना खड्डय़ांमुळे कंटाळलेली आहे. प्रवास करताना जनता सत्ताधाऱयांना मालवणी भाषेतून शुभेच्छा देत आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी आमदार पत्रकार परिषदा घेऊन वारंवार माध्यमांसमोर खोटे बोलून जनतेला फसवित आहेत. आमदार नाईक यांच्यात निधी आणण्याची धमक नाही. प्रशासकीय अधिकाऱयांवर त्यांचा वचक नाही. तरीही आठ दिवसांत हा सर्व निधी आमदारांनी आणल्यास मनसे सरचिटणीस उपरकर यांच्या हस्ते तुमचा ‘मनसे सत्कार’ करू, असेही इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.