आर्थिक विवंचनेतून अनेकांनी संपवली जीवनयात्रा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात आत्महत्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. 2019 मध्ये दर चार मिनिटाला एकाने आत्महत्या केल्याची बाब आकडेवारीतून उघड झाली आहे. जीवनयात्रा संपवणाऱयांपैकी 35 टक्के स्वयंरोजगार करत असल्याची माहितीही पुढे आली आहे. तसेच माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेत असलेले लोक जास्त आत्महत्या करत असल्याचेही दिसून येत आहे.
मागील दशकाच्या तुलनेत या दशकात आत्महत्या वाढल्या आहेत. चेन्नई, बेंगळूर, दिल्लीसारख्या शहरांमध्ये आत्महत्येचा दर जास्त आहे. गेल्या दशकभरात दर लाख लोकसंख्येवर आत्महत्येचा आकडा कमी झाला आहे. 2009 मध्ये ज्या राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती, त्यात सुधारणा झाली आहे. सिक्कीममध्ये एक लाख लोकसंख्येवर 33.1 लोक आत्महत्या करत आहेत, तर बिहारमध्ये हा दर सर्वात कमी म्हणजे 0.5 इतकाच आहे.
भारतात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोल्लममध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वात जास्त (43.1 दर लाख) आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील आसनसोल (37.8) चा क्रमांक लागतो. महानगरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक लोकांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. एक तृतीयांश आत्महत्यांमागे कौटुंबिक समस्या हे कारण असल्याचे दिसून येत आहे.