ऑनलाईन टीम / पुणे :
साखर कारखान्यांसंदर्भात खोटी आकडेवारी देऊन माझ्यावर 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. यात तथ्य नाही. ती माहिती पूर्णत: चुकीची आहे. आपण आयकर विभागाच्या कारवाईनंतर यावर सविस्तर बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे. एसीबी, पोलीस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळय़ा यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे.
राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही. काही कारखाने 3 कोटी, 4 कोटी अशा पद्धतीने विकले गेले आहेत. हे कारखाने कर्ज थकले म्हणून सहकार विभागाने हायकोर्टाच्या कमिटीच्या नियंत्रणाखाली विकले. काही कारखाने काही बिल्डरांनी घेतले, काही राजकीय पक्षाच्या संबंधित लोकांनी घेतले आहेत. त्याबाबत बोललं जात नाही, पण माझ्या नातेवाईकांबाबत बोललं जात आहे, असेही अजित पवार म्हणाले.