मणिपूरमधील एका व्यक्तीची किमया
मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्हय़ात 47 वर्षीय एका व्यक्तीने 20 वर्षांमध्ये ओसाड भूमीला 300 एकरच्या जंगलात बदलून टाकले आहे. या जंगलात आता विविध प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आहेत. जिल्हय़ातील उरीपोक खैदेम लेकाई क्षेत्रात राहणारे मोइरांगथेम लोइया यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी लंगोल पर्वतरांगेत इंफाळ शहराच्या बाहेरील भागात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली होती.
2000 साली चेन्नईतून स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर कोबरू पर्वतावर गेलो होतो. हा भाग कधीकाळी घनदाट जंगलाने व्यापलेला होता, परंतु तेथील जंगलतोडीचे प्रमाण पाहिल्यावर स्तब्ध झालो होतो. निसर्गावरील हे अरिष्ट रोखण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नाच्या अंतर्गत इंफाळ शहराबाहेरील लंगोल पर्वतीय क्षेत्रात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केल्याचे लोइया यांनी सांगितले आहे.
झूम शेतीमुळे ओसाड झालेल्या या क्षेत्राला वेळ अन् समर्पणासह घनदाट जंगलात बदलले जाऊ शकते याची जाणीव मला झाली होती. या ठिकाणाने 6 वर्षांपर्यंत माझ्यासाठी एका घराच्या स्वरुपात काम केले. मी एका झोपडीत एकटाच राहत होतो. येथे बांबू, ओक, फणस आणि सागवानाची रोपं लावली होती. या रोपांच्या खरेदीसाठी स्वतःचे पैसे खर्च केले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे.
लोइया यांनी वाइल्ड लाइफ अँड हॅबिटॅट प्रोटेक्शन सोसायटीची स्थापना केली आहे. हरणांची शिकार होण्याचे प्रमाण येथे अधिक आहे. हा प्रकार रोखण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. वन अधिकाऱयांनी लोंगोल पर्वतरांगेत वृक्षारोपणाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचे लोइया यांनी सांगितले आहे.