कोरोना परिस्थितीमुळे केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 31 जुलैपर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी राहणार आहे. ही घोषणा डीजीसीए या संस्थेने शुक्रवारी केली. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार ही बंदी 15 जुलैपर्यंत होती. मात्र जगभरातील कोरोना स्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे भारतीय लोकांनी विदेशी जाण्यात तसेच विदेशी लोकांनी भारतात येण्यात धोका आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद राहणार आहेत.
22 मार्च 2020 या दिवसापासून भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी भारतात देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता लॉकडाऊन बऱयाच प्रमाणात उठविण्यात आला आहे. मात्र कोरोना रूग्णांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा सुरू करणे योग्य नसल्याचे मत आहे.
ट्रव्हल बबल्ससाठी प्रयत्न
अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देश यांच्याबरोबर ‘ट्रव्हल बबल्स’ साठी भारत प्रयत्नशील आहे. याचा अर्थ मर्यादित प्रमाणात या देशांबरोबर प्रवासी विमान वाहतूक सुरू करणे असा आहे. या देशांमध्ये काम करणारे अनेक भारतीय सध्या भारतात आहेत, त्यांना पुन्हा कामासाठी त्या देशांमध्ये जायचे आहे. म्हणून त्यांच्या सोयीसाठी ही वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरू होणे आवश्यक आहे.
आखाती देशांमधून भारतीयांना आणण्यासाठी, तसेच त्यांना तेथे नेण्यासाठी भाडोत्री विमानवाहतुकीची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आखाती देशांमधील भारतीयांना येथे घेऊन येण्यासाठी भारतीय विमाने उपयोगात आणण्यात येतील. या विमान कंपन्यांना तेथे तिकीटे विकण्याचीही अनुमती दिली जाईल. आखाती देशांमधील विमान कंपन्यांनाही भारतात तिकीटे विकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ही योजना असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.