जलजीवन मिशनअंतर्गत सुविधा
प्रतिनिधी / ओरोस:
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हयातील 372 अंगणवाडी इमारतींना व 185 शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. या शाळांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. आता शाळा व अंगणवाडीतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारने ‘घर तिथे नळ कनेक्शन’ हे ब्रीद वाक्मय घेत जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी भारत निर्माणसह अन्य पाणीपुरवठा योजनेत वाडी-वाडीवार किंवा वस्तीवर पाणी योजना राबविल्या जात होत्या. परंतु आता यापुढे एक पाऊल टाकत ‘घर तिथे नळ कनेक्शन’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हय़ाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सर्व्हे करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हय़ातील एकूण नळधारक किती? किती नागरिकांना नळ कनेक्शन मिळाले नाही? किती लोकांना वैयक्तिक नळ कनेक्शनची गरज नाही? याची माहिती संकलित केली जात आहे.
जलजीवन मिशनमध्ये सुरु असलेल्या सर्व्हेमध्ये जिल्हय़ातील शासकीय अंगणवाडी व शाळा यातील किती अंगणवाडी व शाळांना पिण्याच्या पाण्याची नळ योजना नाही, याची माहिती घेण्यात आली. यात 372 अंगणवाडी व 185 शाळा आढळल्या आहेत. यापूर्वी यातील अनेक शाळा व अंगणवाडी यांना विंधन विहीर व विहीर या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय आहे. परंतु जलजीवन मिशनमधून नळ जोडणीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. या उपाय योजना राबविल्या तर सबंधित शाळा व अंगणवाडी यातील मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच त्यांना इमारतीमध्ये पाणी उपलब्ध होणार आहे.
कार्यवाही सुरु – श्रीपाद पाताडे
जलजीवन मिशनअंतर्गत सर्व्हे करताना जिल्हय़ातील किती शाळा व अंगणवाडी इमारतींना नळ कनेक्शन नाही, याची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचा जलजीवन मिशन आराखडय़ामध्ये समावेश करण्यात आला आहे. याची अंदाजपत्रके बनविणे, तांत्रिक मान्यता देणे, प्रशासकीय मान्यता देणे, निविदा प्रक्रिया करणे, कार्यारंभ आदेश देऊन प्रत्यक्ष काम सुरु करणे अशा प्रकारची कार्यवाही सुरु झाली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यानी दिली.