प्रत्येक खात्यावर 500 रुपये जमा
प्रतिनिधी / बेळगाव
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत बेळगाव जिल्हय़ातील 5 लाख महिलांच्या खात्यावर जनधन योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रत्येक खात्यावर 500 प्रमाणे ही रक्कम जमा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरखर्च चालावा यासाठी केंद्र सरकारने महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे.
मध्यंतरी केंद्र सरकारने शून्य रुपयांवर जनधन खाती सुरू केली होती. गरीब व ज्या महिलांचे अजूनही खाते नाही अशा महिलांचे हे खाते सुरू करण्यात आले होते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न महिलांसमोर आहे. याकरिता केंद्र सरकारने जनधन खात्यावर प्रत्येकी 500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जनधन खातेधारकाच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. एप्रिल, मे व जून असे तीन महिने ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशांना ही रक्कम अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे ही रक्कम काढण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. परंतु नागरिकांनी एकाच वेळी पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना बँक कर्मचाऱयांकडून करण्यात येत आहेत.
व्ही. राहुल (व्यवस्थापक, लीड बँक, बेळगाव)
बेळगाव जिल्हय़ामध्ये एकूण 5 लाख महिलांची जनधन खाती आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एप्रिल महिन्यात त्यांच्या खात्यांवर प्रत्येकी 500 रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.