सुंदर आणि सोपी मांडणी, प्रत्येक घरातली गोष्ट पडद्यावर मांडावी इतकं खरं वाटेल असं कथानक आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे जवळपास 20 वर्षांपूर्वी सुरु झालेली मालिका श्रीयुत गंगाधर टिपरे ही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ही मालिका आता पुन्हा एकदा 15 जून पासून झी मराठीवर संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांनी या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले की, गंगाधर टिपरे उर्फ आबा ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. केदारने मला गंगाधर टिपरे यांच्या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा केली तेव्हा माझ्यासाठी 80 वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं खरोखर आव्हानात्मक होतं. पण ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या मालिकेचा भाग आठवडय़ातून एकदाच प्रसारित व्हायचा. चित्रीकरण करताना केदार आमच्यातील कलाकाराला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचा आणि कलाकारांच्या उस्त्फूर्त काम करण्याला तो प्राधान्य द्यायचा. साधेपणा हा मालिकेचा आत्मा होता.
खलनायक, सासू-सुनेचं भांडण आणि जोडप्याचे विवाहबाह्य संबंध असे कुठल्याही प्रकारचे कथानक नसल्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ही मालिका माझ्या अनुदिनी या कथासंग्रहावर आधारित आहे. यात मी 3 पिढय़ांतील 5 व्यक्तींची रोजनिशी मांडली होती. या रोजनिशीद्वारे चालू घडामोडींवर मार्मिक पद्धतीने टिप्पणी करण्यात येत होती. लेखनाद्वारे मी या पाच भिन्न विचारसणीच्या लोकांचे भावविश्व चितारत होतो. याच कथांचे नंतर पुस्तक प्रकाशित झाले आणि ते केदार शिंदेंच्या वाचनात आले. त्याच्या डोळ्यांसमोर कथांची संपूर्ण मालिकाच उभी राहिली आणि अशाप्रकारे श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेचा जन्म झाला, असे दिलीप प्रभावळकर म्हणाले. जवळपास पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा ही मालिका टीव्हीवर पाहायला खरंच खूप मजा येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण कुटुंबाचं पुरेपूर मनोरंजन ही मालिका करेल आणि संपूर्ण कुटुंबाला व सर्व पिढयांना पुन्हा एकदा एकत्र आणेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.