वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. 22 एप्रिलनंतर देशात सातत्याने प्रतिदिन 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. 1 मे रोजी तर हा आकडा 4 लाखांहून अधिक झाला आहे. या संकटादरम्यन कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि महामारी तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी काही सूचना केल्या आहेत. फाउची जागतिक पातळीवर कोराना संक्रमण रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील आहेत.
भारतात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 6 महिन्यांचा शटडाउन करण्याची गरज नाही, तर याकरता तात्पुरते शटडाउन केले जाऊ शकते असे फाउची यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या 7 अध्यक्षांसोबत काम केलेल्या फाउची यांनी देशाला बंद करणे कुणालाच पसंत नसते, पण भारतात काही आठवडय़ांचा लॉकडाउन संक्रमणाची साखळी तोडू शकतो असे म्हटले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तत्काळ, मध्यवर्ती आणि दीर्घ कालावधीत केल्या जाणाऱया तीन टप्प्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे.
टीका करणे माझे काम नाही
राजकीय टीकाटिप्पणीच्या फंदात मी पडत नाही. भारताने हे संकट कसे हाताळले यावर मी बोलणार नाही. असे केल्याने हा राजकीय मुद्दा ठरू शकतो. मी आरोग्य क्षेत्राशी संबंधित असून राजकारणी नाही असे उद्गार फाउची यांनी काढले आहेत.
लसीकरण उपाय, पण प्रभावात विलंब
त्वरित कुठली पावले उचलू शकता हे सर्वप्रथम पहावे लागेल. त्यानंतर पुढील दोन आठवडय़ांमध्ये कुठली पावले उचलता येतील हे पाहिले जावे. लोकांना लस देणे एक उपाय असू शकतो. पण सध्या लोकांना ऑक्सिजन, रुग्णालयातील उपचाराशी संबंधित समस्या यामुळे कमी होणार नाही. याचे कारण लसीकरणाचा प्रभाव दिसून येण्यास वेळ लागतो असे ते म्हणाले.
ऑक्सिजन, औषधांचा पुरवठा
सध्या लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे. एक आयोग किंवा आपत्कालीन गट स्थापन करून ऑक्सिजन आणि अन्य वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठय़ाश संबंधित नियोजन करण्यात यावे. या कामा अन्य देशांसोबत जागतिक आरोग्य संघटनेचीही मदत घेतली जाऊ शकते. अशा प्रसंगी अन्य देशांनीही भारताच्या मदतीसाठी पुढे यावे, कारण भारतानेही अन्य देशांबद्दल तत्परता दाखविल्याचे विधान डॉ. फाउची यांनी केले आहे.
तात्पुरती रुग्णालये उभारावीत
चीनसारखे काम करणे हा त्यानंतर मध्यवर्ती उपाय असू शकतो. चीनने काही आठवडय़ांमध्ये तात्पुरती रुग्णालये तयार केली होती. भारतातही लोक रुग्णालय आणि उपचार शोधत आहेत. यात अमेरिकेच्या धर्तीवर सैन्याची मदत घेतली जाऊ शकते. अमेरिकेने लसवितरणात नॅशनल गार्डची मदत घेतली होती असे ते म्हणाले.
दीर्घावधीत लस उपयुक्त
दीर्घ काळात लोकांना लस देण्यावरच मी भर देतो. भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2 टक्के लोकांनाच लस मिळू शकल आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. अधिकाधिक लोकांना लस द्यावी लागणार आहे. याकरता लसीचा पुरवठा वाढवावा लागेल. लसउत्पादक कंपन्यांशी करार करावे लागतील. भारत जगाचा सर्वात मोठा लस उत्पादक असला तरीही त्याला मोठी वाटचाल करावी लागणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
लसीचा दुसरा घ्यावा
लसीचा दुसरा डोस घेतल्याने अनेक लाभ दिसून येतात. यात संक्रमणाचा धोका कमी होणे आणि विषाणूबद्दल प्रतिकारक क्षमता मजबूत होणे सामील आहे. लसीचा एक डोस घेतला असेल तर दुसरा डोसही घ्या. विषाणूपासून कमाल संरक्षण व्हावे याकरता लसीचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.