पंतप्रधान मोदींचे उद्गार, विदेश दौऱ्यानंतर मायदेशी परत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय वंशाच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या देशाच्या सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील संसद सदस्य एकत्र बसले होते, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. आपल्या जपान, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ते गुरुवारी भारतात परतले. त्यांनी या दौऱ्यातील अनुभव कथन करताना या प्रसंगाचा उल्लेख केला. सिडनीतील या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. याच कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनाही आमंत्रण होते. सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे खासदार हा कार्यक्रम पाहताना एकत्र बसले होते. याला लोकशाहीचा ‘आत्मा’ असे म्हणतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
विरोधकांना टोला
संसद सदनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून संसदेतून लोकशाहीचा आत्मा शोषून घेतला गेला, अशी टीका त्यांनी केली आहे. या विरोधी पक्षांच्या टिप्पणीवर पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील हा प्रसंग सांगून विरोधकांना टोला हाणला आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त केली जात आहे.
देशवासियांना संदेश
भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले आहे. मी विदेशात गेल्यावर नेहमी भारताच्या प्रगतीसंबंधी बोलतो. भारतातील युवावर्ग किती सजग, पराक्रमी आणि प्रयत्नशींल आहे, याचे वर्णन करतो. हे करताना मला अभिमान वाटतो. या देशातील मतदारांनी देशाला दोनदा पूर्ण बहुमताचे सरकार दिले आहे. त्या बळावर मी विदेशात ताठ मानेने आणि तेथील सत्ताधीशांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून बोलू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गुलामगिरीची मानसिकता नको
जेव्हा या देशातील नागरिक या देशाची संस्कृती आणि इतिहास यांच्यासंबंधी बोलतील, तेव्हा त्यांनी खाली मान घालण्याचे कारण नाही. त्यांनी अभिमानाने आणि गर्वाने देशासंबंधी बोलावे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून आणि न्यूनगंडाने पछाडलेल्या मनोवृत्तीने बोलण्याचे कारण नाही. आज जगात भारताचा जयजयकार होत आहे. याचा मला रास्त अभिमान आहे. तसाच तो या देशातील युवकांना आणि इतर नागरिकांना असावा, अशी अपेक्षा आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.