फोंडा येथील बैठकीत विविध समित्यांची निवड
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
उज्जैनकर फाऊंडेशन जळगाव महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने फोंडा येथील थ्रिफ्ट सोसायटीच्या सभागृहात विशेष बैठक नुकतीच घेण्यात आली.
प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संयोजक प्रकाश तळवडेकर, कार्याध्यक्ष सुनील सावकार, दुर्गाकुमार नावती, विनोद नाईक, साळू भगत, हेमंत खांडेपारकर, राया बोरकर, पुर्णिमा देसाई व माधुरी उसगांवकर उपस्थित होते.
अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन गोव्यातील साहित्यिक पत्रकार अ. भा. साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर हे करतील. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ बाल साहित्यिका सौ. लिला फकीरराव शिंदे या उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी कार्याध्यक्ष सुनील सावकार यांनी दिली. पद्मश्री बा. भ. बोरकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी 7.30 वा. ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार असून महाराष्ट्रातील एकूण 150 साहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी होणार असल्याचे श्री. सावकार म्हणाले.
उद्घाटन सत्रानंतर भोजनसत्र होईल. तद्नंतर 2.30 वा. ‘परिवर्तनवादी प्रवाहांचे मराठी साहित्यातील योगदान’ हा परिसंवाद डॉ. शिवानंद भानूसे औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यामध्ये चिंतामण शिरोळे (नाशिक), डॉ. शोभाताई रोकडे (अमरावती), डॉ. शिवाजीराव शिंद्रे (कोल्हापूर), राजू भिकारो नाईक व विठ्ठल गांवस (गोवा) हे सहभागी होतील, अशी माहिती संयोजक प्रकाश तळवडेकर यांनी दिली.
तद्नंतर 3.30 वा. गोमंतकीय कथाकार दयाराम पाडलोसकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून त्यामध्ये चंद्रशेखर तापी (इंदोर), बबन महामुने (हिवरा), ऍड. विजयकुमार कस्तुरे (चिखली-मेहकर), प्रमोद पिवटे (जळगांव), डॉ. अजय पाटील (जळगाव) व अरुण नाईक (गोवा) सहभागी होतील असे तळवडेकर म्हणाले.
रात्री भोजन सत्रानंतर 8 वा. डॉ. मा. गं. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. यामध्ये गोवा व महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री सहभागी होतील.
या संमेलनामध्ये महाराष्ट्र तसेच गोव्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जातील, असे प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांनी सांगितले.
मान्यवर साहित्यिकांची निवास व्यवस्था, भोजन, व्यासपीठ तसेच इतर विषयांवर चर्चा झाली. साळू भगत, हेमंत खांडेपारकर, राया बोरकर, माधुरी उसगावकर, पुर्णिमा देसाई, विनोद नाईक यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांची निवड करण्यात आली. स्वागत व आभार प्रदर्शन दुर्गाकुमार नावती यांनी केले.