मात्र पादचाऱयांना अडथळा, अडखळून पडण्याची वेळ : शहरात पार्किंगची मोठी समस्या : नियोजनाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने पार्क करण्यात येत आहेत. व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे घरी किंवा दुकानामध्ये ये-जा करण्यासाठी दगड व लोखंडी पाईप आडव्या ठेवून अडथळे निर्माण करण्यात येतात. मात्र याचा फटका नागरिकांना बसत असून, दगडांमुळे अडखळून पडण्याची वेळ आली आहे.
पार्किंग समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही. मध्यंतरी पार्किंगच्या समस्येचे निवारण करण्यासाठी महापालिकेने बेसमेंटमधील व्यवसायांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही बडय़ा व्यावसायिकांनी नेतेमंडळींची भेट घेतल्याने महापालिकेला बेसमेंटवरील कारवाई थांबवावी लागली. त्यामुळे शहरात पार्किंगची समस्या जैसे थे आहे. अनेक इमारतधारकांनी तळघरात किंवा इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था केली नाही. बांधकाम नियमावली धाब्यावर बसवून बांधकाम केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱया वाहनधारकांना पार्किंगची अडचण भेडसावू लागली आहे.
बाजारपेठेत येणारे वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. घरी किंवा दुकानांमध्ये ये-जा करण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी काही व्यावसायिकांनी नामी शक्कल लढवली असून, रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवले आहेत. तर काहीजण लोखंडी पाईप ठेवून अडथळे निर्माण करतात. पण यामुळे ग्राहकांना तसेच ये-जा करणाऱया नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. रस्त्यावर ठेवलेले दगड रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱया पादचाऱयांसह वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत. दुकानातील साहित्य पाहत जात असताना रस्त्यावर दगड असलेले लक्षात येत नाही. त्यामुळे नागरिक अडखळून पडत असल्याचे प्रकार घडत आहेत.
कडोलकर गल्लीतील रस्ता अरुंद असल्याने रुंदीकरण करण्यात आले. तसेच दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण रस्त्यावर दगड ठेवून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. रस्त्यावर दगड ठेवण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून हाता-पायांना इजा होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सदर दगड हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची गरज आहे. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देईल का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.