वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भोजपुरी चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत स्वतःच्या अभिनयाच्या बळावर स्थान तयार करणारी अभिनेत्री नगमा आता राजकारणात सक्रीय आहे. मागील 18 वर्षांपासून ती काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. काँग्रेसकडून अलिकडेच राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात नाव नसल्याने अनेक नेत्यांनी स्वतःचे दुःख व्यक्त केले आहे. यात नेत्यांमध्ये नगमा यांचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे दुःख व्यक्त करत ‘मी कमी पात्र आहे का’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार मी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 2003-04 मध्ये राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले होते. तेव्हापासून 18 वर्षे झाली असून आतापर्यंत एकदाही संधी देण्यात आलेली नाहसी. इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला जातो. अशा स्थितीत मी कमी पात्र आहे का असे प्रश्नार्थक विधान त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला उद्देशून केले आहे. अभिनेत्रीने काँग्रेस नेते पवन खेडा यांच्यासोबत सहमती दर्शवत त्यांच्या ट्विटला रीट्विट केले आहे.
‘बहुधा माझ्या तपस्येत काही तरी कमी राहिले असावे’ असे राजस्थानमधील काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विट करत म्हटले होते. त्यांच्या याच ट्विटला रीट्विट करत अभिनेत्रीने ‘आमची 18 वर्षांची तपस्या इम्रान यांच्यासमोर कमी पडली’ असे नमूद केले आहे. काँग्रेस नेते आणि कवी इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय काँगेसने घेतला आहे.
नगमा चित्रपटसृष्टीत हिट राहिली परंतु राजकारणात फ्लॉप ठरली आहे. तिने बॉलिवूड, भोजपुरी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठे नाव कमाविले आहे. परंतु 2004 मध्ये राजकारणात पाऊल ठेवत तिने 2014 साली मेरठमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु तिला यश मिळू शकले नव्हते. त्याच साली एका जाहीर सभेत नगमा यांच्यासोबत गैरप्रकार घडला होता.