मुंबई / ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. सीबीआयचे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहे. उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.
रम्यान, परमबीर सिंग व अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, असे नमूद करत आरोप करणारी व्यक्ती म्हणजेच परमबीर सिंग राज्य सरकारची शत्रू नव्हे तर प्रशासनाशी हातात हात घालून काम करणारी होती. उच्च न्यायालयाने निर्देश दिले तेव्हा देशमुख मंत्री होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.