लडाख सीमेवर भारत-चीन तणाव कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या लडाख सीमेवर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ चाललेला तणाव सोमवारी काहीसा निवळला आहे. गोग्रा-हॉट स्प्रिंग भागातून दोन्ही देशांच्या सैनिकांनी त्यांच्या तणावपूर्व स्थितीपर्यंत माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन्ही देशांच्या सेनांनी त्यांच्या सर्व अस्थायी पायाभूत सुविधाही मागे हटविल्या असून त्यात बंकर्स आणि इतर बांधकामांचा समावेश आहे.
याबरोबरच या भागातील पूर्ण भूमी समतल (सपाट) करण्यात आली आहे. यापुढे दोन्ही देश या भागांवर लक्ष ठेवणार असून पुन्हा कोणाकडूनही मानवविरहीत भागांमध्ये अतिक्रमण होऊ नये, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही देश आपल्या सैनिक तुकडय़ांना आघाडीवर नियुक्त करणार नाहीत, असे निर्धारित करण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील कमांडर पातळीवरच्या चर्चेच्या 16 व्या फेरीनंतर या भागातून सैन्यमाघारीवर सहमती झाली होती. हा निर्णय 8 सप्टेंबरला घेण्यात आला होता. 12 सप्टेंबरपर्यंत सैन्य माघार पूर्ण करण्याचाही निर्धार करण्यात आला होता. त्याप्रमाणे कृती करण्यात आली.
28 महिन्यांपासूनचा तणाव
गेले 28 महिने या भागात दोन्ही सेना एकमेकींच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभ्या होत्या. कोणत्याही क्षण संघर्ष उंचावेल अशी स्थिती होती. 2020 च्या जूमध्ये गलवान खोऱयात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते आणि भारताने आपले 20 सैनिक धारातीर्थी पडल्याचे स्पष्ट केले होते. चीनने प्रथम त्याच्या हानीची माहिती दिली नव्हती. मात्र, नंतर आपलीही जिवीत हानी झाल्याचे मान्य केले होते. भारतापेक्षा चीनच्या मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट होती, असे अनेक विदेशी माध्यमांनीही स्पष्ट केले होते.
बंकर्सही काढले
चीनने या भागात गेल्या 24 महिन्यांमध्ये मजबूत तटबंदी उभी करण्यास प्रारंभ केला होता. मात्र, चर्चेच्या गेल्या फेरीत सर्व अस्थायी बांधकामेही काढून घेण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाचे तंतोतंत पालन 12 सप्टेंबरला करण्यात आले, अशी माहिती दोन्ही देशांनी दिली आहे. दोन्ही बाजूंची बांधकामे पाडण्याच्या कामावर परस्परांनी लक्ष ठेवले होते. अद्यापही लडाखमध्ये 2 स्थानी भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. या भागांमधूनही दोन्ही देश त्यांच्या सेना नजीकच्या भविष्यकाळात काढून घेण्याची शक्यता आहे. चर्चेच्या अनेक फेऱया पार पडल्यानंतर आता सामोपचाराच्या मार्गाला काहीसे यश येताना दिसत आहे.
भारताकडून देखरेख कायम
सैन्य माघार झाली असली तरी भारताकडून गोग्रा-हॉटस्प्रिंग भागांमध्ये देखरेख ठेवण्याचे काम सुरुच राहणार आहे. चीनने आपली मानवरहित जागेत आलेली सेना आता मागे घेतली असली तरी भविष्यात पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. साहजिकच, तसा प्रसंग टाळण्यासाठी भारत सतर्क राहणार आहे.