हिंसाचार भडकल्याने काही भागात पुन्हा संचारबंदी
वृत्तसंस्था /इंफाळ
मणिपूरमधील मैतेई समुदायाला ‘एसटी’चा दर्जा देण्याच्या विरोधात 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार पुन्हा भडकला आहे. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर लगेचच विष्णुपूर जिह्यातील ट्रोंगलाओबी गावात हिंसाचार उसळला. संशयित कुकी लोकांनी मैतेईंची तीन घरे जाळली. या घटनेचा बदला घेत इतर समाजानेही चार घरे जाळली. त्यानंतर सशस्त्र लोकांनी विष्णुपूरमधील मोइरांगच्या काही गावांवर हल्ला केला. तसेच काही ठिकाणी गोळीबारही झाल्याचे सांगण्यात आले. या गोंधळानंतर मोइरांग येथील मदत शिबिरातील काही लोकांनीही जाळपोळ केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर जिह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्याने झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चंद्रमणी नामक इसमाचा मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बिष्णुपूरमधील हिंसाचारानंतर लोकांनी निदर्शने केली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. इतर जिह्यातही हिंसाचार पसरण्याच्या धोक्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून सावधगिरीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सेनापती जिह्यातील कांगचूप चिंगखेंग जंक्शनवर लष्कराकडून वाहनांची झडती घेतली जात आहे. मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्यांमध्येही चिंता वाढली आहे. मिझोराम आणि आसाममध्ये 10,000 हून अधिक लोकांनी आश्र्रय घेतला आहे.
दोन्ही समुदायांचे दावे-प्रतिदावे
कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड पीपल्स फ्रंट यांच्यात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय संवादातून तोडगा काढला पाहिजे असे कुकी समुदायाचे सदस्य म्हणतात. सरकारचे प्रतिनिधी आमच्याकडे फक्त शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चा का करतात? आधी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. याचदरम्यान कुकी हे म्यानमारमधील घुसखोर असून त्यांना हाकलून लावले पाहिजे असे मैतेई समुदायाने स्पष्ट करत आपणच भूमीपुत्र असल्याचा दावा केला आहे.