ऑनलाईन टीम / मुंबई :
लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी (lakhimpur kheri violence) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (ashish mishra) याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आशिष मिश्राने आत्मसर्पण केले असून, त्याची रवानगी लखीमपूर खेरी कारागृहात (jail) करण्यात आली आहे.
लखीमपूर खेरी येथे काही महिन्यांपूर्वी आशिष मिश्राने आपल्या थार गाडीने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडलं होतं. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर याप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात आशिष मिश्रा याला जामीन दिला होता. त्यानंतर हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आशिष मिश्रा याला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सुनावणीदरम्यान, शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांनी उच्च न्यायालयानं चौकशी अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि आरोपींना दिलासा देण्यासाठी केवळ एफआयआरचा विचार केला, असा आरोप करत जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पीडितांची बाजू नीट ऐकून घेण्यात आली नव्हती आणि जामीन देण्यास घाई करण्यात आली, अशी टिप्पण्णी करत आशिष मिश्रा याचा जामीन रद्द केला. तसेच सात दिवसात त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज मिश्रा याने आत्मसमर्पण केले असून, त्याची रवानगी लखीमपूर खेरी कारागृहात करण्यात आली आहे.