वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सध्या भारतामध्ये टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू असून या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार दि. 28 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळविला जाणार आहे. या सामन्याला यजमान आशिया क्रिकेट मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा अंतिम सामना झाल्यानंतर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चालू वर्षी होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानला मिळाले आहेत पण शासकीय परवानगी शिवाय भारतीय संघाला या स्पर्धेसाठी पाकमध्ये पाठवले जाणार नाही. दरम्यान हा निर्णय केंद्र शासनावर अवलंबून राहिल, असे स्पष्टीकरण शहा यांनी दिली. सदर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या हायब्रिड मॉडेलची शिफारस पीसीबीचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी केली आहे. त्यानुसार या स्पर्धेतील किमान चार सामने घरच्या मैदानावर घेण्याचा प्रस्ताव असून भारतीय संघाचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची योजना आहे. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष नजीम सेठी यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले असले तरी या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी झाल्यानंतरच आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाबाबत निर्णय घेतला जाईल. तथापि अद्याप तरी आशिया चषक स्पर्धेच्या यजमान पदाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तथापि या सामन्यासाठी लंकन क्रिकेट मंडळ तसेच बांगलादेश आणि अफगाण क्रिकेट मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पीसीबीचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी सूचविलेल्या हायब्रीड मॉडेल हे या समस्येवरील भक्कम तोडगा वाटत नाही, असेही जय शहा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या मॉडेलनुसार लंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाण हे संघ आपले चार प्राथमिक सामने पाकिस्तानमध्ये खेळतील तर भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील भारत आणि पाक यांच्यातील सामने लंकेत खेळविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पीसीबीला हे सामने दुबईमध्ये खेळविण्याची इच्छा आहे. भारत आणि पाक यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळविला गेला तर आयोजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल यासाठी पीसीबीचे प्रयत्न चालू आहेत. पण लंकेने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामने भरविण्याची तयारी दर्शवली आहे. 2022 साली दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातून अधिक आर्थिक नफा मिळत असल्याने लंकेने यावेळी भारत-पाक सामना भरवण्याची तयारी दर्शवली आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 1 ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश राहिल. भारत, पाक, लंका, बांगलादेश, अफगाण आणि नेपाळ यांचा यामध्ये सहभाग आहे. हे सहा संघ दोन गटात विभागण्यात येतील. भारत, पाक, नेपाळ एका गटात तर लंका बांगलादेश आणि अफगाण हे दुसऱ्या गटात राहतील असे एसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. जर या आगामी स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलला परवानगी मिळाली तर या स्पर्धेतील चार सामन्यांचे यजमानपद भूषवू शकेल. पाक वि. नेपाळ, श्रीलंका वि. बांगलादेश, बांगलादेश वि. अफगाण आणि अफगाण वि. श्रीलंका हे सामने पाकमध्ये होतील. या स्पर्धेच्या रुपरेषेनुसार प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. सुपर फोर गटामध्ये प्रत्येक संघ प्रतिस्पिर्धी संघाशी सामना खेळेल. सुपर फोर फेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार असून या फेरीनंतर आघाडीच्या दोन संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. सुपर फोर फेरीनुसार भारत आणि पाक यांच्यात किमान दोन सामने निश्चित होतील. भारत आणि पाक हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर त्यांच्यामध्ये तीन सामने खेळवले जातील. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही तर मात्र एसीसीतर्फे सदर स्पर्धेतील सामन्यांसाठी त्रयस्थ देशाची (लंका किंवा संयुक्त अरब अमिरात) निवड केली जाईल.