जिल्हाधिकाऱयांकडून रॅलीचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
बालकामगार रोखणे महत्त्वाचे आहे. जिल्हय़ातून त्याचे पूर्ण उच्चाटन केले पाहिजे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. यासाठी पथनाटय़ाच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. ही बाब अत्यंत समाजाच्यादृष्टीने तसेच मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाची असून या जनजागृतीमध्ये प्रत्येकाने भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाल कामगार विरोधात जनजागृती पथनाटय़ रॅलीत उद्घाटनावेळी बालमजुरी विरोधीगीत सादर करण्यात आले. बेळगाव जिल्हय़ामध्ये 40 ठिकाणी या पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. बालमजुरांना कोणत्याही परिस्थितीत कामावर ठेवून घेवू नये. त्यांना शाळेला पाठवावे, योग्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले.
जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱयांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार आयुक्त व्यंकटेश शिंदीहट्टी, कामगार उपायुक्त तरनूम, योजना अधिकारी ज्योती कंते हे उपस्थित होते.