प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात आला नाही. त्यामुळे बाजारपेठेसह उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आरपीडी कॉर्नरपासून अजंठा हॉटेल शेजारील सराफ कॉलनीकडे जाणाऱया रस्त्याचा विकास करण्यात आला नाही. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर खडी पसरल्याने अपघात होत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. केवळ मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले असून अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहराच्या बाजारपेठेसह उपनगरांतील रस्त्यांची दैनावस्था झाली असून सर्वत्र चरी आणि खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. टिळकवाडी भागातील विविध रस्त्यांवर जलवाहिन्या आणि गॅसवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत.
आरपीडी कॉर्नरपासून सराफ कॉलनीकडे जाणाऱया अजंठा हॉटेलशेजारील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर खडी पसरली आहे. वाहनधारकांना तसेच रहिवाशांना ये-जा करणे कठीण बनले आहे. उपनगरांतील लहान रस्त्यांचा विकास करण्यासाठीदेखील मनपाकडे निधी नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्यावरील खडीमुळे दुचाकी वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत.
या परिसरात विविध महाविद्यालये असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमी असते. त्यामुळे दररोज एक तरी वाहनधारक या ठिकाणी पडून अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या विकासाकडे महापालिका लक्ष देणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.