पुणे / प्रतिनिधी :
मी बापटांसोबत दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कधी संघर्ष झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली. पण सत्ताधारी पक्षाने यंदा खूप चुकीचे राजकारण केले, पैशाचे राजकारण करत निवडणूक लढली. बापटांनी कधी पैसे वाटले नाही, सर्वसमावेशक प्रेमाने राजकारण केले. त्यामुळेच जनतेने त्यांच्या पदरात मते टाकली, असे मत कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
रवींद्र धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. धंगेकर म्हणाले, बापटांनी माझे अभिनंदन केले. तू चांगली मेहनत घेतली, त्याचे फळ तुला मिळाले. नियोजन कर आणि चांगल्या पद्धतीने कामाचा पाठपुरावा कर तुला निश्चित यश मिळेल. तुला अडचण आली, गरज वाटली तर तुला पूर्णपणे मदत करीन. वडीलकीच्या नात्याने त्यांनी सूचना केल्या. पक्षविरहीत राजकारण करताना त्यांनी कधी माणसे संपवण्याचे कुरघोडीचे राजकारण केले नाही. विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी ताकद दिल्याचे मी पाहिले. म्हणून मी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन नक्की करेन, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कसब्यातील विजयानंतर धंगेकर यांनी केसरीवाडय़ात जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली.
अधिक वाचा : देशपांडे हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा