सर्वसाधारणपणे आदिवासी हे मानवी सभ्यतेच्या दृष्टीने मागास आणि काही प्रमाणात असभ्यही मानण्याची पद्धत आहे. तथापि, तामिळनाडूतील आदिवासींनी एक कला अशी जोपासली आहे, की स्वतःला सभ्य आणि सुशिक्षित म्हणवून घेणाऱयांनीही तिच्यापासून स्फूर्ती घ्यावी. या आदिवासी जमातीने जंगलातील अत्यंत विषारी समजल्या जाणाऱया झाडांपासून अत्यंत सुबक अशा नैसर्गिक कलाकृती बनविण्याचे कौशल्य विकसित केले आहे. आज त्यांच्या या कलाकृतींना बाजारामध्ये मोठी किंमतही मिळत आहे. अनेकांनी याचा अभ्यास सुरू केला आहे.
या आदिवासी अधिवास असणाऱया जंगलामध्ये काही वेळेला विषारी वनस्पतींचे रान माजते. या विषारी वनस्पतींमुळे सुपीक जमीनही नापीक होऊ शकते. तसेच या वनस्पतींची पाने किंवा देठ जनावरे किंवा माणसाच्या पोटात गेल्यास त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. अशा वनस्पतींचे काय करायचे, हा प्रश्न या आदिवासी जमातीला हजारो वर्षांपासून पडत आलेला आहे. गेल्या एक हजार वर्षांमध्ये या जमातीने या समस्येवर एक अद्भूत उत्तर शोधून काढले आहे.
अशा विषारी वनस्पतींचे रान माजू लागले की या आदिवासींकडून या विषारी झाडांची तोड केली जाते. मात्र, या वनस्पती खाण्याच्या किंवा जाळण्याच्याही योग्यतेच्या नसल्याने त्यांच्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. यामध्ये हत्तीपासून ते जंगलातील इतर प्राण्यांपर्यंत सर्वांच्या प्रतिकृती बनविल्या जातात. अशाप्रकारे या विषारी वनस्पतींची कोणत्याही सजीवाला अपाय न होता विल्हेवाट लावली जाते. गेल्या शंभर वर्षांपर्यंत या आदिवासींच्या या कौशल्याची कोणालाही कल्पना नव्हती. पण आदिवासींचा अभ्यास करणाऱया काही संशोधकांनी त्यांच्यामधील हे गुण हेरले आहेत. विषारी वनस्पतीपासून बनलेल्या या सुबक आणि कल्पक वस्तूंना आता शहरांमध्ये मोठी बाजारपेठ प्राप्त झाली आहे. यातून या आदिवासींनाही चांगल्यापैकी प्राप्ती होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांचे हे कौशल्य साहाय्यभूत ठरताना दिसून येत आहे.