250 विमानांची खरेदी होणार ः पंतप्रधान मोदी अन् फ्रान्स अध्यक्षांमध्ये ऑनलाइन बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर इंडिया-एअरबस भागीदारीच्या लाँचिंग कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सामील झाले. यावेळी रतन टाटा देखील उपस्थित होते. एअर इंडियाने एअरबसकडून 250 विमानांची खरेदी करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारात 40 विमाने वाइड बॉडी ए350 प्रकारची तर 210 विमाने नॅरोबॉडी सिंगल-आइजल ए320 नियोस प्रकारची असल्याची माहिती टाटा समुहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी, फ्रान्स अध्यक्षांसह नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन आणि एअरबसचे सीईओ गिलाउमे फाउरी हे करारादरम्यान उपस्थित हेते.
हा महत्त्वपूर्ण करार भारत आणि फ्रान्स यांच्यातील वृद्धिंगत होणाऱया संबंधांसह भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्राचे यश आणि आकांक्षा दर्शवित असल्याचे मोदींनी बैठकीदरम्यान म्हटले आहे. तसेच एअर इंडिया आणि एअरबसला करारासाठी शुभेच्छा देताना कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल मॅक्रॉन यांचे मोदींनी आभार मानले आहेत.
रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमच्या (उडान) माध्यमातून देशातील दुर्गम भाग देखील हवाईसंपर्काद्वारे जोडले जात आहेत. यामुळे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळतेय. भारताच्या मेक इन इंडिया-मेक फॉर द वर्ल्ड दृष्टीकोनाच्या अंर्तत एअरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नव्या संधी निर्माण होत असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्य तसेच जागतिक अन्नसुरक्षा आणि आरोग्यसुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश मिळून सकारात्मक योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय प्रणालीचे स्थैर्य आणि संतुलन निश्चित करण्यात दोन्ही देशांची भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मोदी म्हणाले.
एअर इंडिया-एअरबस भागीदारी ही प्रेंच एअरोस्पेस कंपनी आणि त्याचे सहकारी भारतासोबत सहकार्यासाठी नव्या क्षेत्रांना विकसित करण्यासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे दर्शविते. आम्ही भारतासोबत मिळून बरेच काही साध्य केले आहेत. भारतीय लोकांची क्षमता पाहता खूप मोठी वाटचाल करण्याची आमच्याकडे ऐतिहासिक संधी असल्याचे उद्गार फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी काढले आहेत. भारतीय विमानोड्डाण क्षेत्राला पुढील 15 वर्षांमध्ये 2 हजारांहून अधिक विमानांची गरज भासणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एअर इंडिया आता एअरबसकडून 250 विमानांची खरेदी करणार आहे. यातील 40 वाइड बॉडी एअरक्राफ्ट तर 210 नॅरोबॉडी असतील अशी माहिती टाटा समुहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी दिली आहे. टाटा समुहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते.