मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
बावनकुळे म्हणाले, मोदी सरकारने गरीब कल्याणच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशाला सामर्थ्यशाली, समृद्ध बनवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांना यश मिळत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोदी सरकारप्रमाणेच विविध समाजसघटकांच्या कल्याणाच्या योजना आखत आहे. अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महविकास आघाडी सरकारने जनकल्याणाची कोणतीच कामे केली नाहीत. ‘फेसबुक लाईव्ह सरकार’ जावून आता कार्यक्षम सरकार आले आहे. या सरकारने शेतकऱ्यांना 7 हजार कोटींची मदत केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घेतले आहेत.
अधिक वाचा : कोरोनानंतर आता सुपरबगचा धोका
केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिनाच्या सरकारमुळे मोठय़ा प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवली जातील, त्याचबरोबर संघटन मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासह 45 पेक्षा अधिक जागा तर विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य करू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप लेले याप्रसंगी उपस्थित होते.