ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. तर भाजपकडूनही हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस कालच्या घडामोडीनंतर दिल्लीला रवाना झाले होते. आता भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत (Mumbai) येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. ही सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी तर सुरू नाहीय ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेनतून बाहेर पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असताना शिंदे यांनी आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचे म्हंटले आहे. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. ३७ हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे ४० आमदार असल्याचं म्हटलंय. यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट सत्तास्थापनेची तयारी तर करत नाहीये ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहेत. कालपासून गुजरात भाजपचे नेते एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. आता भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात घडत असलेल्या या हालचालीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे मिळून सरकार स्थापन करणार की काय? आणि येत्या काळात काय घडामोडी घडतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.