पुणे / प्रतिनिधी :
केंद्रातील भाजपच्या सरकारचे शंभर अपराध भरले असून, आता अंतिम लढय़ाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जोशी म्हणाले, देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षड्यंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल. राहुल गांधींच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत राहिल्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कटकारस्थानात मास्टरकी असणाऱ्या भाजपने राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा लोकशाहीविरोधी प्रयत्न आहे. मात्र, देशातील जनता या लोकशाहीविरोधी मोदी सरकारला सत्तेवरून दूर केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पुण्यातील कसबा विधानसभा असो अथवा भाजपच्या ताब्यातील हिमाचल प्रदेश असो. जनतेने भाजपला धूळ चारली आहे व काँग्रेसला विजयी केले आहे. त्यामुळेच स्वतःला महानायक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला धडकी भरली आहे, असा निशाणाही त्यांनी साधला.
गेली 9 वर्षे मनमानी पद्धतीने जनताविरोधी निर्णय घेत मित्र असणाऱ्या मूठभर उद्योगपतींचे खिसे भरण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. सारा देश अदानींच्या घशात घालण्याच्या मोदी आणि भाजपच्या महापापाला राहुल गांधी यांनी जोरकस विरोध केला. याशिवाय ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला राहुल गांधींनी आपलेसे केले. त्यांच्यामुळे आपले पंतप्रधानपद व सत्ता जाणार हे ओळखल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संसदेत गोंधळ घालून राहुल गांधींना आठ दिवस बोलू दिले नाही. हा सगळा षड्यंत्राचाच भाग असून, देशातील जनतेत संतापाची लाट उसळली असल्याचेही जोशी यांनी या वेळी सांगितले.
अधिक वाचा : बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार?