28 रोजी मोर्चा : यशस्वी करण्याचा निर्धार
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून कन्नड सक्तीचा फास आवळला जात असताना महाराष्ट्र सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दि. 28 रोजी चलो मुंबईचा नारा देण्यात आला असून हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मराठा मंदिर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाला सीमाभागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासाठी नियोजन केले जात असून, राहण्याच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींशी चर्चा केली जाणार आहे.
नाव नोंदणीचे आवाहन
मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासाठी नाव नोंदणी करावयाची आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत तर खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत नावे विभाग समितीकडे द्यावयाची आहेत. तसेच वाहनांचे क्रमांक महाराष्ट्र सरकारला दिले जाणार असून टोल माफीची विनंती केली जाणार आहे. अध्यक्ष दीपक दळवी यांनी खानापूर म. ए. समितीने एकी करत कार्यकारिणीची निवड केल्याबद्धल कौतुक केले. निपाणी येथून शेकडो कार्यकर्ते मोर्चासाठी सहभागी होतील, अशी माहिती जयराज मिरजकर यांनी दिली. खानापुरातूनही मराठी भाषिक सहभागी होण्यासाठी जागृती केली जाईल, असे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, यशवंत बिर्जे व पदाधिकारी उपस्थित होते.