शांतता कायम राखण्यासाठी प्रतिबद्ध ः बीएसएफ
वृत्तसंस्था/ अमृतसर
दिवाळीनिमित्त सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या जवानांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अटारी येथे सोमवारी दोन्ही देशांचे जवान झिरो लाइनवर एकत्र आले. बीएसएफ कमांडेंट जसबीर सिंह आणि त्यांच्यासोबत अन्य अधिकारी आणि जवानांनी पाकिस्तान रेंजर्सला दिवाळीनिमित्त शुभेच्छा अन् मिठाई दिली आहे. पाकिस्तान रेंजर्सने देखील बीएसएफ अधिकारी आणि जवानांना मिठाई देत आभार मानले आहेत.
सीमेवर शांतता कायम राखण्यासाठी बीएसएफ प्रतिबद्ध असल्याचे बीएसएफचे अधिकारी जसबीर सिंह यांनी म्हटले आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोज पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या नात्यांमध्ये कटूता निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून चालत असलेला स्वीट एक्सचेंज प्रोग्राम (मिठाईचे वाटप) बंद करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना संकट सुरू झाल्यावर सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परंतु मागील वर्षी 2021 पासून दोन्ही देशांनी पुन्हा कटूता बाजूला सारत मिठाईची देवाणघेवाण सुरू केली आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरही बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशदरम्यान मिठाईंचे आदान-प्रदान झाले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर आसामच्या करीमगंज नजीक सुतारकंडी बीओपीमध्ये भारताकडून बीएसएफ आणि बांगलादेशच्या वतीने बीजीबी तैनात आहे. उत्सवानिमित्त दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमधील सौहार्द पुन्हा एकदा दिसून आला आहे.