वार्ताहर /चापगाव
खानापूर बस आगारातून गुरुवार दि. 14 पासून खानापूर-चापगाव व्हाया जळगा, कारलगाहट्टी, करंबळ मार्गावर नव्याने बस सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे शालेय विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
सदर बस प्रारंभदिनी चापगाव बसस्थानकावर ग्रामपंचायत समिती व शालेय विद्यार्थ्यांच्यावतीने स्वागत व पूजा करण्यात आली. यावेळी ग्रा.पं. उपाध्यक्ष मारुती चोपडे, माजी सभापती सयाजी पाटील, ग्रा.पं. सदस्य नागराज यळ्ळूरकर, नजीर सनदी, अभी पाटील, हणमंत मादार, पिराजी मादार, पत्रकार पिराजी कुऱहाडे यासह नागरिक, प्रवासी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
बस दररोज सकाळी 8.30 वाजता खानापूर बस आगारातून सुटणार असून जळगा-चापगाव-कोडचवाडला जाऊन पुन्हा चापगाव येथून 9 च्या सुमारास निघून जळगामार्गे खानापूरला पोहोचणार आहे. यामुळे या भागातील गावांतील शालेय विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.
जळगा, कारलगाहट्टी या गावच्या लोकांना इतिहासात पहिल्यांदाच आपल्या गावापर्यंत बसचे भाग्य लाभणार आहे. या गावाला सुलभ रस्ता नव्हताच. अलीकडे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून चापगाव-जळगा-करंबळ रस्ता सुसज्ज झाल्याने आता वाहतुकीला मुभा मिळाली
आहे.
सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना सोयीस्कर
या मार्गावर आता बस सुविधा उपलब्ध झाल्याने जळगा येथील विद्यार्थ्यांना खानापूरला येण्यासाठी तसेच या भागातील नागरिकांना चापगाव भागात जाण्या-येण्यासाठी सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे नियमित असणारी दुसरी बस पूर्वीप्रमाणेच खानापूर आगारातून सकाळी 7.30 वा. सुटून लालवाडीमार्गे चापगाव, देमिनकोपपर्यंत जाऊन पुन्हा लालवाडीमार्गे खानापूरला 8.30 वाजता पोहोचणार आहे. या दोन बसेस सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरणार आहेत.