पुणे / वार्ताहर :
कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमात अनुयायांना गळय़ात माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी केल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर अनुयायांनी बळजबरीने आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी लाठीमार करत त्यांना बाहेर काढले. दरम्यानच्या काळात आश्रम परिसरात अनुयायांनी मोठा राडा घातला. याप्रकरणी जवळपास 120 अनुयायांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 143, 147, 452, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद त्रिपाठी ऊर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी ऊर्फ ऊर्फ स्वामी चैतन्य किर्ती, गोपाल दत्त भारती ऊर्फ स्वामी गोपाल, राजेश वाधवा ऊर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल ऊर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा ऊर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान ऊर्फ कुनिका भट्टी, मीडिया प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह एकूण 120 अनुयायांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत धनेश कुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (वय 65, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. याच वादातून ओशो ट्रस्टच्या विरोधातील अनुयायांनी 22 मार्च रोजी ओशो आश्रम येथे बेकायदेशीर जमाव जमवला. आश्रमाच्या गेटमधून जबरदस्तीने आत प्रवेश करुन ट्रस्टच्या विरोधात घोषणाबाजी करुन, तक्रारदार यांना शिवीगाळ करत आरोपी प्रमोद त्रिपाठी यांनी ट्रस्टच्या सदस्य साधना (80 वर्षे) यांना धक्काबुक्की केली. तसेच ओशो आश्रमाच्या विरोधात घोषणाबाजी करुन अनुयांयाना भडकावले होते.