पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागतो, असे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या विषयावरील वादावर पडदा टाकत असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. विविध संघटना रस्यावर उतरल्याने राज्यातील वातावरण पेटले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढत जाहीर माफी मागितली आहे. यासंदर्भातील पत्रात ते म्हणतात, ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळय़ावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटत आहे. या मुद्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये, असे मला वाटते. मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तीही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असेल, तर तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.