वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख व माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा हे एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या दरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंविषयी ते शंका उपस्थित करताना दिसले आहेत. शर्मा यांनी ‘झी न्यूज’ने केलेल्या स्टिंगदरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या अंतर्गत चर्चेचा खुलासाही केला आहे.
80 ते 85 टक्के तंदुरुस्त असूनही अनेक खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शने घेतात, असा आरोप शर्मा यांनी केला आहे. सप्टेंबरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘टी20’ मालिकेसाठी प्रॅक्चरमधून सावरणाऱया बुमराहने पुनरागमन करण्याच्या मुद्यावरून आपण व संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद राहिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बुमराह अजूनही मैदानाबाहेर आहे आणि बॉर्डर-गावस्कर चषकासाठीच्याच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेप्रमाणे त्यानंतरची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही त्याला हुकण्याची शक्यता आहे. माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात ‘इगो’चा संघर्ष होता, असा दावाही शर्मा यांनी केला आहे.