पुणे / प्रतिनिधी :
Cold will increase in Maharashtra उत्तर भारतात पाठोपाठ आलेल्या दोन पश्चिमी झंझावातात पुरेसा कालावधी न मिळाल्यामुळे थंडीचा अपेक्षित परिणाम राज्यात जाणवला नसला, तरी पुढच्या टप्प्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात येत्या काही दिवसात थंडीत वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवेच्या कमी दाब क्षेत्राचे थंडीवर आक्रमण होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून किमान तपमानात वाढ होत आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली आहे. गुजरात, राजस्तानमधील थंडीचा जोर ओसरला आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून राज्यात सध्या किमान तपमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश डिग्रीने वाढ झाली आहे. परिणामी थंडीही काहीशी कमी झाली आहे. मात्र, सद्य:स्थितीत राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मात्र अधिक उंचीपर्यंत ढगाळसदृश्य धुक्याचे मळभ आच्छादित असल्यामुळे रात्रीतून जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दिर्घलहरी उष्णता- ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नसल्यामुळे किमान तपमानात अपेक्षित घसरण होत नाही. दिवसाही अशा वातावरणामुळे लघुलहरी उष्णता-ऊर्जा जमीन तापवत नाही त्यामुळे हवेचा थरही शुष्क केला जात नाही आणि त्यामुळे थंडी तितकीशी जाणवत नसल्याचे चित्र राज्यात आहे. उत्तरेकडून मंद झुळूक असणार्या वार्याच्या वेगात अधिक वाढ झाल्यामुळे, उत्तर भारतात जी काही उपलब्ध थंडी आहे, तिचे वहन महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे दिवसा हवेत गारवा सध्या कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवत आहे. पुढील चार ते पाच दिवसात वातावरण निवळण्याची अपेक्षा हवामान विभागाने वर्तविली आहे.
अधिक वाचा : …हे मोदींना शोभत नाही
दरम्यान, मागील 24 तासात गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात गोंदिया येथे नीचांकी 7 अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात 28 अंश कमाल व 16.3 अंश किमान तपमानाची नोंद झाली. तर सातारा 18.6, कोल्हापूर 18.9, सांगली 20, सोलापूर 18.5, रत्नागिरी 21, नाशिक 15.5, नागपूर 9.9 व पणजीत 22.4 इतके तापमान नोंदविण्यात आले.